नवी दिल्ली -केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे संयुक्त किसान मोर्चाने स्वागत केले आहे. आता त्या मोर्चाकडून रविवारी पुढील रणनीती जाहीर केली जाणार आहे.
कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा करत आहे. आता प्रमुख मागणी मान्य झाल्याने मोर्चा कुठली पाऊले उचलणार याविषयी उत्सुकता आहे.
त्यापार्श्वभूमीवर, मोर्चाच्या मुख्य समितीची दोन दिवसीय बैठक शनिवारी आणि रविवारी होईल. त्यानंतर पुढील रणनीती जाहीर केली जाईल, अशी माहिती शेतकरी नेते दर्शन पाल यांनी शुक्रवारी दिली. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला ते चांगलेच झाले. पण, ते कायदे संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात औपचारिकरित्या मागे घेतले जायला हवेत.
शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीविषयी (एमएसपी) आम्हाला कायदेशीर हमी हवी अहे. त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलनस्थळं सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या दोन दिवसीय बैठकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.