मॉस्को – भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक रायफलींच्या करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या हाती एके-47 203 या मारक क्षमतेत अत्यंत प्रभावी असणाऱ्या रायफली येणार आहेत. चीनी कुरापतींमुळे सीमेवर तणावाची स्थिती असतानाच्या काळात संबंधित महत्वपूर्ण घडामोड घडली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावेळी दोन्ही देशांमध्ये रायफल करार निश्चित झाला. भारतीय लष्कराला 7 लाख 70 हजार एके-47 203 रायफली हव्या आहेत. त्यातील 1 लाख रायफली रशियाकडून पुरवल्या जातील. इतर रायफलींचे उत्पादन भारतातच केले जाईल.
प्रत्येक रायफलचा खर्च अंदाजे 1 हजार 100 डॉलर्स इतका असेल. त्या रायफली इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम (इन्सास) असॉल्ट रायफलींची जागा घेतील. इन्सासचा वापर 1996 पासून होत आहे. मात्र, हिमालयावरील उंच ठिकाणी त्या रायफली जॅम होण्याच्या आणि मॅगजीन क्रॅक होण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एके-47 प्रकारातील अत्याधुनिक रायफली भारतीय लष्करासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकतील.