नवी दिल्ली – अग्निवीर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(आरआरएस) कल्पना असून ती अजित डोवाल यांनी सैन्यावर लादली आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्राच्या अग्निवीर योजनेवर जोरदार निशाणा साधला. “भारत जोडो’ यात्रा संपवून परतलेले राहुल गांधी मंगळवारी वेगळ्याच अविर्भावात दिसले. राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात “भारत जोडो’ यात्रेची माहिती देत केली. “यात्रेच्या 3,600 किमीच्या टप्प्यात असंख्य तरुण, शेतकरी यांनी आपल्या व्यथा माझ्यासमोर मांडल्या.
तसेच अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रारदेखील केली. ही योजना सैन्यालादेखील रुचलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित डोवाल यांनी ही योजना सैन्यावर लादली आहे, अशी माहिती सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी दिली, असा खळबळजनक आरोप राहुल यांनी लोकसभेत केला.
प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी – पंतप्रधान मोदी
भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकायला मिळाल्याचे राहुल यांनी यावेळी सांगितले. राहुल म्हणाले, आज पायी प्रवास करण्याची परंपरा संपुष्टात आली आहे. चालताना सुरुवातीला लोकांचे आवाज ऐकू येत होते. आम्ही हजारो लोकांशी बोललो, ज्येष्ठ आणि महिलांशी बोललो. अशा रीतीने जनसामान्यांचा आमच्याशी बोलत प्रवास सुरू झाला. मी एक किंवा दोन किलोमीटर, दहा किंवा पंचवीस किलोमीटरबद्दल बोलत नाही. मी तब्बल 3,600 किमी चालून व यादरम्यान लाखो लोकांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या ऐकून आलो आहे. शेतकरी, कष्टकरी,मजूर यांनी बेरोजगारी, महागाई यांवर समस्या समोर मांडल्या.