नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रुग्णालयातून देशातील तरुणांना संदेश दिला आहे. या संदेशात सोनिया गांधी यांनी अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवकांच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी म्हटलं.
सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटलं की, “भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे तुमचे स्वप्न आहे. लष्करात लाखो पदे रिक्त असूनही, गेल्या तीन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही. मी तुमच्या वेदना समजू शकते. शिवाय हवाई दलातील भरती परीक्षा देऊन निकाल आणि नियुक्तीची वाट पाहणाऱ्या तरुणांबद्दलही मला पूर्ण सहानुभूती असल्याचं सोनिया गांधी यांनी नमूद केलं.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हा संदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केला आहे. या संदेशात काँग्रेस पक्ष आंदोलक तरुणांना पाठिंबा देताना दिसत आहे. सोनिया गांधींनी आपल्या संदेशात पुढे लिहिले की, मला दुःख होतय की, तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने नवीन सैन्य भरती योजना जाहीर केली, जी पूर्णपणे दिशाहीन आहे. तुमच्यासह अनेक माजी सैनिक आणि संरक्षण तज्ज्ञांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे ही योजना परतावून तुमच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं.
देश के युवाओं के नाम @INCIndia अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी की तरफ से संदेश। pic.twitter.com/K7BYcnNODw
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 18, 2022
खर्या देशभक्ताप्रमाणे अहिंसा, संयम आणि शांततेचा मार्गाने आम्ही तुमचा आवाज सरकारसमोर बुलंद करू. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या सोबत आहे, असंही सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.