नगर – पेन्शन वाढीच्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत ईपीएस 95 पेन्शनर्स संघर्ष समितीतर्फे गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष सर्जेराव दहिफळे, भाऊसाहेब इथापे, बलभिम कुबडे, प्रमोद मुत्त्याल, सुभाष कुलकर्णी, दत्तात्रय शिंदे, गोरख बेळगे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करुन लवकरच दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनासाठी संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
ईपीएस 95 च्या पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढी संदर्भात गेल्या अकरा वर्षापासून आंदोलने, निदर्शने, मोर्चे सुरू आहेत. मात्र अद्याप पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ केलेली नाही. 2014 मध्ये किमान पेन्शन रुपये 1 हजार ईपीएस धारकांना देण्यात आली. त्याआधी या ईपीएस 95 पेन्शनधारकांना 200 ते 700 रुपये पेन्शन मिळत होती. या पेन्शनधारकांना 1 हजार पेन्शन करण्यात आली.
त्यानंतर पेन्शनमध्ये वाढ केली गेली नाही. देशभरात 72 लाख पेन्शनर आहे. त्यापैकी 8 लाख पेन्शनर महाराष्ट्रात आहे. मात्र त्यांनी 800 ते 3 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. पेन्शनवाढीसाठी गेल्या वर्षभरापासून देशभर आंदोलन सुरू आहेत. मध्यंतरी पेन्शन वाढकरिता कोशियारी समिती नेमली होती. त्या समितीने किमान 3 हजार रुपये पेन्शन व त्याला महागाई भत्ता लागू करण्याची शिफारस केली होती. परंतु केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. पेन्शनवाढीसह अन्य काही महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.