प्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार; शेकडो उद्योजक व कर्मचाऱ्यांचा सहभाग
कराड – ओगलेवाडी परिसरात विजेचा सततचा खेळखंडोबा होत असल्याच्या कारणात्सव प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने संतप्त झालेल्या उद्योजक व कर्मचाऱ्यांनी सोमवारी वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजितराव बानगुडे यांनी दिला. दरम्यान वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना उद्योजकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी अजितराव बानगुडे, मनोज माळी, महेश शिंदे, आबा इनामदार, शेखर कलबुर्गी, श्रीधर कलबुर्गी, प्रदिप शिंदे, संदीप कोटणीस, मनोहर वंजारी, शौकत पटेल, राजाराम मुळीक, अरूण कणसे, उद्योजक व कर्मचारी उपस्थित होते.
अजितराव बानगुडे म्हणाले, औद्योगिक वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे उद्योजकांचे नुकसान होत आहे.
दिवसातून तासन्तास वीज गायब होत असल्याने कामगारांना फुकटचा पगार द्यावा लागत आहे. तसेच उत्पादनावरही परीणाम होत आहे. चालू कामात अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने अनेक महागड्या मशिन नादुरूस्त होत आहेत. आर्थिक मंदीमुळे उद्योग अडचणीत आले असताना वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे ओगलेवाडीतील औद्योगिक वसाहत बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा वीज वितरणकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सुधारणा होत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करू. यावेळी संदीप कोटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.