संकलन : नंदकुमार मोरे, फलटण
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा आज (बुधवार, दि. 22) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्यशैलीचा घेतलेला आढावा…
महाआघाडीचे सरकार आले आणि काही महिन्यांतच कोव्हिड- 19 चे मोठे संकट देशासमोर उभे ठाकले. यात महाराष्ट्र आघाडीवर होता. कारण महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य. शिक्षण व उद्योगाच्या निमित्ताने इथे अनेक लोक बाहेरून येत जात असतात. त्यामुळे राज्यावरील करोनाचे संकट अधिक गहिरे होते. सरकार नवीन होते.
सरकारमध्ये अनुभवी लोक असले तरी हे संकट हाताळणे जिकिरीचे जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी सातत्याने संवाद साधत होते. आरोग्य मंत्रीसुद्धा माध्यमांमध्ये दिसत होते. त्या त्या खात्याचे सर्व मंत्री माध्यमांसमोर येत होते; परंतु सरकारमधील एक अतिमहत्त्वाची व्यक्ती कित्येक दिवस झाले तरी पडद्यावर येत नव्हती.
कुठेही बोलताना दिसत नव्हती. ती व्यक्ती सकाळी सात वाजता मंत्रालयात जाऊन आणि रात्री उशिरापर्यंत थांबून या भयानक संकटात राज्याचा गाडा हाकण्यासाठी झटत होती. राज्यातील बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, आदी सर्व लोकांना जमेल तसा, अगदी फोन करून आधार देत होती.
ती व्यक्ती म्हणजे ना. अजितदादा पवार. राज्यात इतक्या महत्त्वाच्या पदावर काम करताना प्रसिद्धीपासून लांब राहून दीनदुबळ्यांसाठी अहोरात्र काम करणे सोपे नसते. त्यासाठी अजितदादाच असावे लागते. ते कोणालाही शक्य नाही. असेच काम त्या दरम्यानच्या काळात पार्थ पवारही करत होते, ते पुढे येईलच.
तसेही अजितदादा माध्यमांमध्ये फार दिसत नाहीत. लोकांची कामे करणे व प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. 2014 च्या आधीच्या सरकारमध्येही दादांनी अनेकांची कामे नुसत्या फोनवर मार्गी लावली होती. ज्यांना दादांचा अनुभव आलाय ते दादांबाबत भरभरून बोलतात. त्यांच्या बोलण्यात अजितदादांबाबत आपलेपणाची भावना असते.
दादांना माध्यमांपेक्षा प्रत्यक्ष लोकांमध्ये राहायला आवडते; परंतु इतके काम करणाऱ्या, बाहेरून कडक व आतून मऊ, जीवाला जीव लावणाऱ्या अजितदादांबद्दल माध्यमे तितकासा आपलेपणा का दाखवत नाहीत, हा प्रश्न अनेक वेळा पडत आला आहे, तरीही हा माणूस खचत नाही. तो त्याच जोमाने राज्यातील जनतेसाठी काम करतोय आणि तेही प्रसिद्धीपासून दूर राहून.
माध्यमांपासून अंतर ठेवण्याचा, पत्रकारांशी तितकेसे मैत्रीपूर्ण संबंध नसल्याचा फटका ज्याप्रमाणे अजितदादांना बसला. सातत्याने कामे करूनही मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली. तेच पार्थ पवारांबाबतही घडले.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक संकटे आली. सातारा, सांगली, कोल्हापूरला महापुराने थैमान घातले होते. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी पार्थदादांनी हवे तेवढे अन्नधान्य, पिण्याचे पाणी व अन्य मदत केली. त्यानंतर मध्यंतरी दादांचे काम तसे सुरुच होते. गेल्या काही महिन्यांपासून जगाला करोनाच्या संकटाने घेरले आहे.
राज्यातही परिस्थिती गंभीर झाली होती. लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. अनेक विद्यार्थी पुणे, मुंबईत अडकून पडले होते. कामगार, मजुरांचे हाल होत होते. त्यावेळीही दादांनी मोठे काम केले. तब्बल 25 हजार लोकांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्यामार्फत राज्यातील विविध भागांत केली जात होती. काही ठिकाणी ती आजतागायत सुरू आहे. तीन लाखांपेक्षा जास्त मास्क पार्थदादांनी वाटले. सॅनिटायझर्सचेही वाटप केले.
संकटांची ही मालिका राज्यात इथेच थांबली नाही. हे सर्व सुरू असताना काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात “निसर्ग’ चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. लोकांची शेती नष्ट झाली, घरे पडली. लोकांचे प्रचंड हाल झाले. त्यावेळीही हा माणूस धावून गेला. तब्बल 17 टन गहू, तांदूळ व पिण्याच्या पाण्याच्या दहा हजार बाटल्या रायगडला पाठवून दिल्या. एवढे सगळे मी करतोय, असा गवगवाही कुठे केला नाही.
शांततेत काम सुरू होते. या कामाची दखल लोक का घेत नाहीत, हे मला अद्याप समजलेले नाही. हा माणूससही काम करतोय. कोणालाही न भेटता, न अनुभवता त्याच्याबाबत आपले मत बनवणे हे असमजूतदारपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. त्यामुळे एकदा त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, त्या व्यक्तीला अनुभवलं पाहिजे.
मग जाणवेल आणि विश्वास बसेल की बोलणारे फक्त बोलतच असतात आणि कमी बोलणारे समाजासाठी खूप काही करत असतात. त्यांच्यासाठी प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे नव्हे तर जनता केंद्रस्थानी असते, समाजातील प्रत्येक दिनदुबळा घटक केंद्रस्थानी असतो.
जे बोलतात ते करुन दाखवतात !
मागील 5 वर्षात पोलिस भरतीच झाली नव्हती, त्यावर अजितदादांनी वारंवार तत्कालीन सरकारला फटकारलं होतं. आज 10 हजार पोलिस भरतीची घोषणा त्यांनी केली. करोनाच्या काळात अनेकांच्या रोजगारावर संकट आलं असताना ही भरती राज्यातल्या ग्रामीण व शहरी भागांतील तरुणांसाठी संधी आहे!