हैदराबाद-लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) विलिनीकरणासाठी साकडे घातले आहे. त्यामुळे त्या डाव्या पक्षांचे एकत्रीकरण होणार का, याविषयीची उत्सुकता बळावली आहे.
भाकपचे सरचिटणीस एस.सुधाकर रेड्डी यांनी अलिकडेच डाव्या पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची भेट घेतली. त्या भेटीत रेड्डी यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची गरज अधोरेखित करणारे पत्र येचुरी यांना दिले. निवडणुकीतील पीछेहाट ध्यानात घेऊन यावेळी कार्यकर्तेच माकपच्या नेतृत्वावर विलिनीकरणाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी दबाव टाकतील, अशी आशा भाकपला वाटत आहे.
कम्युनिस्ट चळवळीत 1964 मध्ये फूट पडून भाकप आणि माकप अशी स्वतंत्र रचना झाली. मात्र, त्या फुटीची कारणे आता संदर्भहीन बनली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण व्हावे, अशी भूमिका भाकपने खूप आधीपासून घेतली आहे. भाकपच्या त्या भूमिकेला माकपने अजूनपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भाकप पुन्हा एकदा माकपपर्यंत पोहचला आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाकप आणि माकपच्या एकत्रित संख्याबळाने नीचांकी पातळी गाठली आहे. लोकसभेत माकपचे 3 तर भाकपचे 2 खासदार आहेत.