औरंगाबाद – महाराष्ट्रातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ऊस आणि इतर पिकांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सन 2017 मध्ये येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा सर्व राज्यभर पसरला होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सुरू झालेले हे आंदोलन 5 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे सरपंच धनंजय धनवटे यांनी पीटीआयला सांगितले. सरकारने आपल्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निफाड आणि कोपरगावसारख्या जवळपासच्या भागातील शेतकरीही या आंदोलनात सामील झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात पुणतांबा ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांनी 16 मागण्या सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांच्या काही मागण्यांचा संदर्भ देताना धनवटे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती; परंतु आता साखर कारखाने हा उस घेत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून ते पीक जाळून टाकत आहेत किंवा आत्महत्या करीत आहेत, असे ते म्हणाले.
ज्या शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे, त्यांना राज्य सरकारने हेक्टरी 2 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, कांदा उत्पादकांना 500 रुपये प्रति क्विंटल मदत मिळावी, वीज बिलांची माफी द्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली 2017 मध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी मोठा शेतकरी संप पुकारला होता. तो राज्यभर गाजला होता.