प्रती क्विंटल 700 ते 900 रुपये वाढ : खाद्यान्न साठवण्याचे काही देशांचे धोरण
पुणे(प्रतिनिधी) – भारतीय बासमती तांदळाचा सुगंध संपूर्ण जगभर दरवळत आहे. जगात करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खाद्यान्नांचा साठा करण्याचे धोरण अनेक देशांनी अवलंबिले आहे. परिणामी. मागील काही महिन्यात भारतातून बासमती आणि इतर तांदळाची निर्यात जवळपास 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे बासमती तांदळाच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दर्जानुसार क्विंटलमागे 700 ते 900 रुपये वाढ झाली आहे. देशातून पारंपारिक बासमतीची निर्यात युरोप आणि युरोपीयन देशांमध्ये होते. तसेच 1121,1401,1509 या बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने इरान, इराक, दुबई, बहरीन, साऊदी या देशात जास्त प्रमाणात होते. तसेच सरबती आणि सुगंधा तांदुळाची निर्यात आफ्रीकन देशांमध्ये होत आहे.
सध्या जगभरातील या देशासह अनेक देशांनी देशातील तांदळाचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने भारतातली तांदळाच्या खरेदीला पसंती दिली आहे. मागणी वाढल्याने 1121 आणि 1401 तांदुळाच्या स्टीम, सेला प्रकारामध्ये साधारण 600 ते 900 रुपये वाढ झाली आहे . तसेच सरबती व सुगंधामध्ये 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.