नवी दिल्ली : देशात सध्या लाखोंच्या घरात करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असली तरी सरकारकडून लॉकडाउनचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. बहुतांशी राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे तर. काही राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लावावे कि नाही यावर जागतिक आरोग्य संघटनेने आपले मत मांडले आहे.
डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन याविषयी माहिती दिली आहे. “भारतासारख्या देशात, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावले हानी पोहोचवू शकतात. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांनी सुचवले की, करोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. डब्ल्यूएचओ प्रवास बंदीची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरत नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणतात की, “भारत आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्य कृती ठरवण्यासाठी चार प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. पहिला- करोना विषाणूचा नवीन प्रकार किती संसर्गजन्य आहे. दुसरा- नवीन प्रकारामुळे होणारा रोग किती गंभीर आहे. तिसरा- लस आणि पूर्वीचे करोना संसर्गाला माणसाला किती संरक्षण देतात आणि चौथा – सामान्य लोक या धोक्याला कसं पाहतात आणि ते टाळण्यासाठी उपायांचे पालन कशा पद्धतीने करतात. या चार प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जावा,” असे ते सुचवतात.
ऑफ्रिन म्हणाले की, “संपूर्ण लॉकडाउन लादण्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त आहे, कारण संसर्ग रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे खूप आर्थिक नुकसान होते. भारतासारख्या देशात जेथे लोकसंख्येत खूप विविधता आहे, तेथे साथीच्या रोगाशी लढण्यासाठी जोखीम-आधारित दृष्टिकोन अवलंबणे शहाणपणाचे वाटते.”