यवत पोलीस ठाण्यावर समाजाच्या वतीने दिले निवेदन
यवत- मातंग समाजावर सतत अन्याय होत असल्याने या घटनांच्या निषेधार्थ, तसेच सर्व घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींवर त्वरीत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागण्यांसाठी आज (दि. 27) मातंग समाजाच्या वतीने यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी स्वीकारले.
राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणाचा झालेला निर्घृण खून, अकोला येथील तरुणीवर बलात्कार करून तिचा झालेला खून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केलेला सामूहिक बलात्कार, सातारा येथील तरुणाचा झालेला निर्घृण खून यासह विविध प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने मातंग समाजाचे नागरिक व महिला सहभागी झाले होते.
मातंग समाजाला न्याय न मिळाल्यास संघटनेच्या वतीने व समस्त मातंग समाजाच्या वतीने राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे राज्याचे अध्यक्ष म्हस्कु शेंडगे यांनी यवत पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी म्हस्कु शेंडगे, तालुका अध्यक्ष काळुराम शेंडगे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पंचरास, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बबन खंडाळे, दौंड पंचायत समिती सदस्या नीशा शेंडगे, रुपाली शेंडगे, अजय वाल्हेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुका अध्यक्ष दत्ता डाडर, मातंग आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय अढागळे, बहुजन लोकभियानचे तालुका अध्यक्ष विजय शेंडगे, नीलेश शेंडगे यांसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.