वाघांचा कॉरिडॉर असल्याचे पुरावे मिळाल्याचा प्राणी संशोधकांचा दावा
पुणे – सह्याद्रीच्या घनदाट पर्वतरांगांमध्ये अधिवास करणाऱ्या वाघांच्या अस्तित्वाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, नुकतेच निसर्ग अभ्यासक आणि वन्यजीव प्रेमी नागरिकांनी केलेल्या पाहणीअंतर्गत त्यांना या पर्वतरांगांमध्ये वाघांच्या पावलांचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे सह्याद्री हा वाघांचा कॉरिडॉर आहे, या बाबीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वाघांचा भ्रमणमार्ग असल्याचे अनेक वन्यजीव अभ्यासकांकडून सांगितले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांत येथे वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध नसल्याने हे ठिकाण वाघांचा भ्रमणमार्ग राहिला नाही, असा दावा काही अभ्यासकांकडून केला जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली आणि आसपासच्या परिसरात वाघांच्या वावराच्या खुणा आढळत आहेत.
“सह्याद्री निसर्ग मित्र’ आणि “बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने राबविलेल्या “ई-मॅमल’ प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी तिलारीजवळील मांगेली गावातील कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांचे छायाचित्र कैद झालेले आहेत. तर आंबोलीतील वन्यजीव निरीक्षक काका भिसे यांनी आंबोली आणि आसपासच्या परिसरामध्ये वाघाच्या पावलांचे ठसे आणि त्याची विष्ठा येथील वन्यजीव निरीक्षकांना आढळल्याचे सांगितले आहे.
याबाबत वाघांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तिलारी परिसरात वाघांचा अधिवास असून यातील नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर सुमारे 200 चौ.कि.मी. असल्याचे निदर्शनास आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे वाघ स्थलांतरित नसून येथील स्थानिक आहेत.’
तिलारी ते राधानगरीदरम्यान परिसरात वाघांचा वावर आहे. राधानगरीपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली अभयारण्यापर्यंतचे अंतर पूर्ण करणे वाघांसाठी सहजसोपे असले, तरी या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी वसाहत आहे. त्यामुळे सुरक्षित कॉरिडॉर नसल्याने वाघांना तिथवर पोहचण्यास अडचणी येतात. त्यामुळेच हा पूर्ण पट्टा आरक्षित करण्याची गरज आहे.
– गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक