नवी दिल्ली, दि, 27 – देशातील न्याय व्यवस्था उद्धवस्त झाली असून तेथे कोणाला न्याय मिळेल याची आता शाश्वती राहिली नाही असे जाहीर वक्तव्य करून न्याय व्यवस्थेची बदनामी केल्याच्या कारणावरून माजी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या विरोधात बदनामीचा खटला चालवण्यास अनुमती दिली जावी अशी मागणी ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्याकडे करण्यात आली होती. पण वेणुगोपाल यांनी ती मागणी अमान्य केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही मागणी त्यांच्याकडे केली होती. देशातील सर्वोच्च पातळीवर काम करणाऱ्या न्यायाधिशांच्या विरोधात खटला भरण्यासाठी ऍटर्नी जनरल यांची अनुमती लागते. ती अनुमती मागण्यासाठी गोखले यांनी त्यांच्याकडे अर्ज केला होता.
त्याला उत्तर देताना वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, त्यांची ती मुलाखत आपण प्रत्यक्ष ऐकली असून त्यात त्यांनी न्याय व्यवस्थेची अवहेलना होईल अशी कोणतीही भूमिका मांडलेली नाही, त्यांनी या संस्थेच्या भल्यासाठीच काहीं निरीक्षणे नोंदवली आहेत असे आपले मत झाले आहे. त्यांनी कठोर शब्दप्रयोग वापरले असले तरी त्यातून न्याय व्यवस्थेतील गैरप्रकारांवर प्रहार करण्याचाच इरादा दिसतो असेही वेणुगोपाळ यांनी म्हटले आहे.