कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज एकाच दिवसात तीन प्रचारसभा घेत भारतीय जनता पार्टीला जोरदार आव्हान दिले. परिवर्तन हा खरेतर आपल्या पक्षाचा नारा होता. मात्र विरोधी पक्षांनी अर्थात भाजपने तोही कॉपी केला असा दावा करतानाच प. बंगाल जिंकल्यानंतर आपण राजधानी दिल्लीकडे कूच करणार असल्याचे जाहीर करत त्यांनी भाजप सरकारला इशाराही दिला.
आपण वाघासारखे असून कधीही भाजपपुढे माथा टेकणार नाही. हे डोके केवळ जनतेपुढे झुकेल असे सांगताना भाजपने महिला आणि दुर्बल घटकांवर केवळ अत्याचारच केला असा आरोप त्यांनी केला. मेदीनीपूर येथील तीन रॅलींमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की दिल्लीत गेल्यानंतर भाजपचे सरकार उखडून फेकण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
मतदारांना भुलविण्यासाठी भाजपचे नेते विमान आणि हेलीकॉप्टरमधून नोटांनी भरलेल्या बॅगा घेउन बंगालमध्ये दाखल होत आहेत. तसेच बाहेरून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनीच राज्यातील हॉटेल भरून टाकल्या आहेत असे नमूद करताना भाजपने निवडणुकीसाठी तब्बल 100 विमाने भाड्याने घेतली असल्याचा आरोपही त्यांनी केला.