पुणे – दोघींची लग्न आत्याच्या मुलांशी झाली. त्यानंतर घरच्यांनी त्या दोघींनाही घराबाहेर काढले. तब्बल दोन वर्षे पोटभर जेवणासाठी सामाजिक संस्थांची मदत घेणाऱ्या दोन बहिणींना कौटुंबिक न्यायालयामुळे न्याय मिळाला आहे. तात्पुरत्या पोटगीसाठी केलेला अर्ज मंजूर करत दोघींना प्रत्येकी सहा हजार रुपये आणि मुलासाठी दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालायने दिला आहे.
क्षुल्लक कारणांच्या वादामुळे दोन्ही सुनांना सासू आणि दिराने घराबाहेर काढले. पण, सासऱ्यांनी दया दाखवून एक छोटी खोली देत त्यांची राहण्याची सोय केली. पण, दोघींचे आणि त्यांच्या मुलांचे जेवणाखाण्याचे हाल होऊ लागले. नवऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते आरडाओरड करून निघून जात असत. त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. मात्र, नांदायला येण्यासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून त्यांचा किराणा बंद करण्यात आला.
प्राजक्ता आणि सुरेखा (नावे बदललेली) अशी दोघींची नावे आहेत. दोघींच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचे प्रयत्न करूनही सासूने त्यांना घरात घेतले नाही. त्यानंतर त्यांनी नांदायला येण्याचा अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या त्रासात भर पडली. त्यांना कधीतरी दिला जाणारा किराणाही बंद करण्यात आला. जेवणही बंद झाले. त्या दोघींनी वकिलामार्फत तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केला. लॉकडाऊन काळात किराणा किटवर त्यांनी पोट भागवले. अखेर न्यायालयाने अर्जाच्या तारखेपासून (दोन वर्षांपासून) दोघी बहिणींना तात्पुरती पोटगी देण्याचा आदेश दिला. मुलांच्या शाळेची फी जेव्हा द्यावी लागेल, तेव्हा नवऱ्यांनी ती द्यावी. तसेच अर्जाचा खर्चही नवऱ्यांनी अर्जदार यांना द्यावा, असे आदेशात नमूद केले आहे. दोघी बहिणींच्या वतीने ऍड. संग्राम माधवराव जाधव व ऍड. प्राची संग्राम जाधव यांनी काम पाहिले.