मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. 60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केले. हे विमान इंडिगोचे होतं. तर मुंबईवरुन पहिल्या विमानाने पाटणाच्या दिशेने सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती.
सुरुवातीच्या टप्प्यात 2800 उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये-जा सुरु झाली होती. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह तर होता. पण मनात कोरोनाची भीती असल्याचेही काही प्रवाशांनी म्हटले. दरम्यान, यासाठी विमानतळांवर विशेष तयारी करण्यात आली होती.
प्रवासी रात्रीपासूनच प्रवाशांची गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंगसाठी विमानतळावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ते प्रवाशांना सातत्याने डिस्टन्स ठेवण्याची सूचना करत होते. विमानतळावर सातत्याने उद्घोषणा केल्या जात होत्या. सोबतच सर्व प्रवासी मास्क परिधान केलेले दिसत होते.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी आसनव्यवस्थेतही बदल करेला आहे. प्रवाशांना एक खुर्ची सोडून बसावं लागणार आहे. सोबतच सर्व प्रकारच्या तपासणी करुनच प्रवाशांना आत सोडलं जात आहे. विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स, मास्क्स यांसारखी साधनं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.