मुंबई – राज्यात यंदा पावसाने थैमान घातले असून ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात हाहाकार उडाला होता. रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये न भूतो अशी पुरस्थिती निर्माण झाली होती. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. याला तब्बल अडीच महिने उलटल्यानंतर आता केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे.
येत्या मंगळवारी, 5 ऑक्टोबर रोजी हे पथक रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी खेडमधील पोसरे येथे भेट देत पाहणी करत हे पथक चिपळूण येथे दाखल होईल. या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत हे पथक माघारी परतणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यात देखील पथक पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्राचे पथक पाहणी दौऱ्यावर येणार आहे. यावेळी दौऱ्याबाबत नाराजी असून काही प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत. पथकाकडून आता नेमकी कोणत्या गोष्टींची पाहणी केली जाणार आहे? हा सारा प्रकार म्हणजे आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्तांमधून येत आहे.
दरम्यान, सध्या पूरग्रस्त भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या कालावधीत राज्य सरकारकडून झालेल्या मदतीवर काही नाराजी देखील पाहायाला मिळत आहे. पण, आता तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर केंद्राचे पथक पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे.