मुंबई – तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. तथापि, यातून कोठेही पाणी तुंबल्याची घटना अजून तरी समोर आलेली नाही.
हवामान खात्याने शहरात काही ठिकाणी जोराचे तर अन्य काही ठिकाणी अतिजोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार शहरात सकाळपासून जोरदार सरी बरसल्या. उपनगरीय रेल्वे वाहतूक आणि बेस्टची बस वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.
पावसामुळे मुंबईलगतचा समुद्र खवळलेलाच राहील, असाही अंदाज आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर थडकत आहेत. गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले होते. जवळपास सर्वच शहरामध्ये पाणी तुंबल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच वाहनांची वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती.