येलवाडीतील रिंगरोड प्रश्न : प्रशासनाच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित
देहूगाव – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील आठवड्यात अर्थात सोमवारी (दि. 12) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित शेतकरी आणि उपोषण करता सामाजिक कार्यकर्ता यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची प्रांत अधिकारी संजय तेली यांच्या लेखी आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते वसंत भसे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी सोडले.
देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येलवाडीला जोडणाऱ्या इंद्रायणी नदी पुलालगत येलवाडी हद्दीतील एका शेतकऱ्याची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात भूसंपादन प्रक्रिया प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे अनेक वर्षांपासून रखडल्याने रिंगरोडच्या अर्धवट असलेल्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते वसंत भसे यांनी शुक्रवारी (दि. 2) गांधी जयंती दिनी आमरण उपोषण सुरू केले होते.
दुसऱ्याच दिवशी शनिवारी आमदार दिलीप मोहिते यांच्या विनंतीवरून आणि खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या लेखी आश्वासनानंतर आमदार भोसले, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.
मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीयुत पोतदार, जिल्हा परिषदेचे शैला खंडागळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, देहूच्या माजी सरपंच पूनम काळोखे, देहू कॉंग्रेसचे शहराध्यक्ष देवीदास जाधव, सांगुर्डी व येलवाडी ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
…अन्यथा पुन्हा आंदोलनाचे अस्त्र
सोमवारी (दि. 12) जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक होऊन तीन महिन्यांत कामास प्रारंभ न झाल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती वसंत भसे यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
रखडलेल्या कामावर “दैनिक प्रभात’ने टाकला प्रकाश
देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येलवाडी व देहू यांना जोडणाऱ्या रिंगरोडमधील रखडलेल्या कामासंदर्भात दैनिक प्रभातमधील प्रसिद्ध बातमी आणि सामाजिक कार्यकर्ते भसे यांनी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी उपोषणापूर्वीच जिल्हाधिकारी यांना काम मार्गी लावण्याचे निवेदन देत सूचना केल्या होत्या.