बिगर बासमती तांदळाच्या भावात मोठी वाढ
महिन्यात घाऊक बाजारात किलोमागे 3 ते 4 रुपयांनी वाढ
300 ते 400 रु. क्विंटलमागे झालेली भाववाढ
पुणे – लांबलेल्या पावसाचा फटका तांदळाला बसला आहे. सर्वसामान्यांच्या ताटात असलेला नॉन बासमती अर्थात बिगर बासमती तांदळाच्या भावात महिनाभरात घाऊक बाजारात क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती जयराज ऍन्ड कंपनीचे संचालक तथा तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. दरम्यान, पाऊस आणखी लांबल्यास पुढील सहा महिने तांदळाचे भाव तेजीत राहतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात नॉन बासमती तांदळाची पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी पाएी टंचाईमुळे या क्षेत्रांत तांदळाची कमी प्रमाणात लागवड झाली आहे. जेथे लागवड झाली, तेथे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जरी उत्पादन झाले, तरीही तांदळाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. परिणामी, लागवडीनंतर जुना माल विकायचे शेतकऱ्यांनी थांबविले आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याचे दिसून येत आहे.
उत्पादन क्षेत्रातच मागणी
तामिळनाडू आणि कर्नाटक ही सोनामसुरी आणि कोलम प्रजातीच्या तांदळाचे उत्पादक राज्ये आहेत. येथूनच संपूर्ण देशात या तांदळाची निर्यात होते. मात्र, यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. या दोन्ही राज्यातच सोनामसुरी आणि कोलमला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गुजरात येथून तिकडे दोन्ही प्रकारचा तांदूळ जात आहे. परिणामी, उत्पादक राज्यासह संपूर्ण देशात या दोन्ही प्रकारच्या तांदळाचे भाव वाढल्याचे शहा यांनी सांगितले.