मुंबई : मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून वाद पेटला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याआधी परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय.
याच मुद्य्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
कारण यापूर्वी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा राष्ट्रपती कोविंद गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.