हैदराबाद – बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एमआएम पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. त्या यशाने खुषीत आलेले या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आता आम्ही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशात आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे म्हटले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आता लवकरच निवडणुका येऊ घातल्या आहेत.
काल रात्री पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. एमआयएम हा पक्ष केवळ भाजप विरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचेच काम करीत असतो असा आरोप सातत्याने केला जात आहे त्या विषयी विचारले असता ओवैसी यांनी म्हटले आहे की, आम्ही एक राजकीय पक्ष चालवत आहोत आणि आम्हाला आमच्या बॅनर खाली निवडणूक लढवण्याचा पुर्ण अधिकार आहे. आमच्यामुळे भाजप विरोधातील मतांमध्ये फाटाफूट होते म्हणून आम्ही निवडणूकच लढवायची नाही काय असा सवालही त्यांनी केला आहे.
आम्ही आता पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशातही लढणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक लढवण्यासाठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे असा आरोप सातत्याने केला जात आहे. पण या आरोपांकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
बिहार मध्ये चार राजकीय पक्षांनी एक ग्रॅंड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट नावाची आघाडी केली होती. त्यात या पक्षाचा समावेश होता. बहुजन समाज पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पार्टी हा पक्षही त्या आघाडीत सहभागी होता.
एमआएम पक्षाने एकूण 20 जागा लढवल्या. त्यातील पाच जागा त्यांनी जिंकल्या असून अन्यत्रही त्यांना चांगली मते मिळाली आहेत. आता बिहार मध्ये कोणत्या आघाडीला पाठिंबा देणार या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. अजून संपुर्ण अधिकृत निकाल हाती यायचा आहे, त्यानंतरच आम्ही त्या विषयी निर्णय घेऊ असे ते म्हणाले.