सातगाव पठार भागात लगबग : परतीचा पाऊस चांगला झाल्याने दिलासा
पेठ – पावसाचे प्रमाण चालूवर्षी वाढल्याने विहिरी, तळी व तलाव भरलेले आहेत. त्यामुळे जिरायती जमीन क्षेत्रात रब्बी हंगामातील पिके घेण्याचा भर वाढला आहे. कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जिरायती कांदा लागवड करीत आहे.
सातगाव पठार ता आंबेगाव भागात रब्बी हंगामातील ज्वारी पीक शेतकरी घेत असतात; परंतु चालू वर्षी पाऊस खूप पडला. त्यामुळे जिरायत शेतीत पीक घेण्यासाठी विहिरी पूर्ण भरल्या आहेत. कांदा पिकाला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिली. सातगाव पठार भागात ज्वारीबरोबर कांदा लागवड मोठ्या संख्येने केली गेली आहे. फुरसुंगी, नाशिक व इतर जातीचे कांदा बियाणे शेतकऱ्यांनी तयार केले.
20 फूट लांबी बाय 3 फूट रुंदीच्या कांदा बियाणे एका वाफ्याचे 4 ते 5 हजार रुपये बाजारभाव आहेत. कुरवंडी, भावडी, थुगाव भागात 40 टक्के कांदा लागवड झाली आहे.ज्वारी पिकात मात्र घट झाली. पठार भागातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील बटाटे काढल्या नंतर कांदा लागवड केली आहे.
तीनशे रुपये प्रति मजूर देऊन कांदा लागवड केली. बियाणे, खते, औषधे व किरकोळ खर्च मिळून एकरी 20 हजार खर्च येत असल्याचे भावडी येथील शेतकरी रोहिदास चक्कर पाटील सोपानराव नवले यांनी सांगितले. पारगाव, पेठ, कारेगाव येथे कांदा लागवड अद्याप चालू आहेत. थूगाव येथील अनेक शेतकरी ज्वारी पीक रद्द करून कांदा पीक घेत आहेत.