मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये थंडीचा कहर चांगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तापमानाचा पारा देखील सरासरीपेक्षा एक ते दोन सेल्सिअसने खाली आला आहे. त्यामुळे कोकणसह मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
मध्य महाराष्ट्रात काय स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. साधारणत: दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवणार नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, तीन डिसेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. या ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. दुसरीकडं संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. थंडीचा परा आणखी वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. सात डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.