नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान, यानंतर भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालांचा परिणाम राज्यसभेतील भाजपच्या पक्षीय बलावर होणार आहे. जर या दोन ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले असते, तर त्याचा पक्षाला राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासाठी फायदा झाला असता. पण आता या दोन्ही राज्यांत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे राज्यसभेतील पक्षाच्या जागा वाढण्यावर परिणाम होणार आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यांत तर भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्याचबरोबर पक्षाच्या जागाही कमी झाल्या. त्यामुळे त्याचा राज्यसभेतील पक्षाच्या गणितांवर परिणाम होणार आहे. त्यातच आता महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यसभेत भाजपला अपेक्षित संख्याबळ गाठण्यावर परिणाम होणार आहे.
राज्यसभेत महाराष्ट्रातून 19 तर हरियाणातून पाच सदस्य पाठवले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेल्या सदस्यांपैकी सात सदस्य हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेलेले आहेत. तर 11सदस्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून गेले आहेत. या सदस्यांपैकी 7 सदस्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये संपतो आहे. तर अन्य सहा जणांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपतो आहे. त्यामुळे त्यावेळी तेवढेच सदस्य महाराष्ट्र विधानसभेच्या माध्यमातून राज्यसभेत पाठविण्यात येणार आहेत.
राज्यसभा संशोधन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेत एक उमेदवार निवडून पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभेत साधारणपणे 30 ते 40 आमदारांचे बळ लागते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र बघितल्यावर महायुतीकडे 163 जागा आहेत. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडे 106 जागा आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होत असलेल्या राज्यसभेसाठीच्या निवडणुकीत महायुतीकडून चार सदस्य तर महाआघाडीकडून दोन सदस्य सहजपणे राज्यसभेत पाठविता येणार आहेत. साधारणपणे हीच स्थिती 2022 मधील निवडणुकीतही राहणार आहे. या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या असत्या, तर त्याचा फायदा पक्षाला राज्यसभेतील आपली ताकद वाढविण्यावर झाला असता. पण सद्यस्थिती हे होणार नसल्याचे दिसते आहे.