नवी दिल्ली – यंदा या ईव्हीएमवरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सुरुवातीपासून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवरील गदारोळ कमी झाला आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला.
मतदान संपताच कडक सुरक्षेमध्ये ईव्हीएमची रवानगी स्ट्रॉंगरूममध्ये होते. येथे ईव्हीएम अंधारामध्ये ठेवली जातात. कारण ईव्हीएमचा संपर्क कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक सॉकेटसोबत संपर्क येऊ नये. मतमोजणीनंतर विजयी आणि पराभूत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात येते आणि सीलबंद करून रूम बंद करण्यात येते. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो.
यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि यावर त्यांची स्वाक्षरीही असते. याबाबत निवडणूक अधिकारी सांगतात, निवडणुकीच्या निर्णयांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना 45 दिवसांचा अवधी दिला जातो, यादरम्यान मतगणना प्रक्रियेवर त्यांना संशय असेल तर ते पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी करू शकतात.
45 दिवस ईव्हीएम स्ट्रॉंगरूममध्ये जवानांच्या पहाऱ्याखाली सुरक्षितरित्या ठेवण्यात येते. 45 दिवसांनंतर ईव्हीएम सुरक्षितरित्या स्टोअरेज रूममध्ये नेण्यात येते, येथे निवडणूक आयोगाचे इंजिनिअर ईव्हीएमची तपासणी करतात. सर्व काही ठीक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे ईव्हीएम पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज होते.
निवडणूक अधिकारी सांगतात, निवडणुकीमध्ये वापरण्यात येणारे 20 टक्के ईव्हीएम रिझर्व्ह ठेवण्यात येतात. कारण काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे ईव्हीएम खराब झाल्यास तेथे याचा पुरवठा केला जाऊ शकतो. ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड असंभव असल्याचे ते म्हणाले.