आळंदी-कार्तिकी वारीत अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर जुजबी कारवाई पालिका प्रशासनाने केली; मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे वारी झाल्यानंतर पुन्हा पदपथावर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे पूर्ववत झाली. यामुळे वारीत अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठीच्या पोलीस बंदोबस्ताला खर्च केलेले पन्नास हजार रूपये वाया गेल्याची चर्चा शहरात आहे.
गेली अडीच वर्षांपासून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत पालिकेला नागरिकांकडून विचारणा केली जाते. मात्र प्रशासन आणि बांधकाम विभाग सध्या या विषयावर मूग गिळून आहे. अखेर कार्तीकी वारीत अतिक्रमण काढले जाईल असे वाटले; मात्र पोलीस बंदोबस्ताचे कारण देत करवाई करण्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी लांबवले.
अखेर पोलिसांनी पन्नास हजार रूपये भरून घेत पालिकेला अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त दिला आणि कार्तिकी वारीत पालिकेने अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली. यामधे आळंदी पालिकेसमोर एका माजी नगरसेवकाचे हॉटेल पाडले. पाण्याच्या टाकीखालील अनधिकृत शेडबांधकाम पाडले. देहूफाट्यावरही अशाच पद्धतीने कारवाई केली. शहरातील हातगाड्या आणि टपऱ्यांवर तसेच महाद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र वारी झाल्यानंतर लगेचच अनधिकृत शेडबांधकाम पुन्हा जैसे थे दिसू लागले आहे. अनधिकृत बांधकामाबाबत पालिका मुख्याधिकारी समीर भूमकर आणि बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड यांना माहिती देऊनही अद्याप कारवाई करण्याचे टाळले.