नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसद भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. यावरून देशभरातील २० पक्षांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असं म्हणत विरोधकांनी संयुक्त निवेदन जारी करून बहिष्कार जाहीर केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. तर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
संसद लोगों की आवाज़ है!
प्रधानमंत्री संसद भवन के उद्घाटन को राज्याभिषेक समझ रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
राहुल गांधी यांनी यासाठी एक ट्विट करत “संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत,” असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. त्यासोबतच, अनेकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावाही विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे. त्यामुळे यावरून देशातील राजकारण तापले आहे.
शरद पवारांनी नेहरूंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. “आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.