नवी दिल्ली – शेतकरी आंदोलन चालूच रहावे अशी काही शक्तींची वैयक्तिक आणि राजकीय हेतूंपोटी इच्छा आहे. आंदोलनाचे पावित्र्य संपल्यावर तोडगा अवघड असतो, अशी तीव्र प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
शेतकरी नेत्यांशी चर्चेची अकरावी फेरी झाल्यानंतर तोमर पत्रकारांशी बोलत होते. सरकारकडून शेतकरी नेत्यांना अनेक प्रस्ताव देण्यात आले. कृषी कायद्यांना स्थगितीचा सर्वोत्तम प्रस्तावही मांडण्यात आला. त्यापेक्षा अधिक चांगला आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी वगळता कुठला प्रस्ताव शेतकरी नेत्यांकडे असेल तर तो देण्यास सांगण्यात आले आहे.
शेतकरी संघटनांच्या अंतिम निर्णयाची उद्यापर्यंत प्रतीक्षा करू. सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी नेत्यांकडून सकारात्मक विचार होण्याची आशा आहे, असे तोमर म्हणाले.