मुंबई – मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत आहेत. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याचिका दाखल केल्या होत्या, असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,’ मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस यांनी यामध्ये राजकारण करू नये..महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाऊ. विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं.’
ते पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अजित पवार या सर्वांना मराठा आरक्षण हवं आहे. जो मार्ग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता त्याच मार्गावर हे सरकार चालल होतं, त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे.’ असं म्हणत त्यांनी फडणविसांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे.