– गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – इंदापूर तालुक्यात सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायांवर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. भवानीनगर भाजी मंडईवर परिणाम झाला आहे. फळविक्रेतेही अडचणीत आहेत. नोटाबंदीपासून ते आतापर्यंत छोटे-मोठे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. कोणत्याही व्यवसायाला गती नसल्याने व व्यावसायिकांच्या मालाला उठाव नसल्याने सर्व घटकांतील व्यापारी ग्राहकाविना मंदीच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. येथील व्यापारपेठेत महिन्याकाठी 10 लाखांवर उलाढाल होत होती. मात्र, तीन वर्षांनंतरही उलाढाल 3 ते 4 लाखांवर घसरली आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील भाजी मंडईतील उलाढाल साधारण दिवसाकाठी प्रत्येक भाजी विक्रेत्यांची पाच हजार रुपये होत होती. परंतु नोटाबंदीपासून हळूहळू पाच हजारांवरून साडेचार, चार, तीन आणि सध्या एक हजार रुपयांवरच येऊन ठेपली आहे. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती फळ विक्रेत्यांचीही आहे. त्यांचाही व्यवसाय चार ते पाच महिन्यांपासून आर्थिक संकटात आहे. मंदीतून मार्ग कसा काढायचा, याच चिंतेने सर्व व्यापारी ग्रासले आहेत.
भवानीनगर येथे महागणपती व्यापारपेठ ही नावाजलेली आहे. सुमारे 100 दुकाने आहेत. याठिकाणी कपडे, किराणा, हॉटेल आदी अनेक व्यवसाय सुरू आहेत. दिवसाकाठी 3 ते 4 लाखांपर्यंत उलाढाल आहे. परंतु अनेक व्यावसायिक दुकानातील माल ग्राहक खरेदी करण्यास येत नसल्याने उठाव मंदावला आहे. दुकानात माल शिल्लक आहे. परंतु मंदीचे सावट असल्याने ग्राहक खरेदी करण्यास धजावत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची उलाढाल होत आहे. मात्र, किराणा व्यापाऱ्यांच्या दुकानात थोड्याफार प्रमाणात ग्राहक दिसत आहेत. परंतु बाकीचे उरलेले छोटे-मोठे व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत.
व्यापाऱ्यांनी पतसंस्था, बॅंकेतून कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते कसे फेडायचे आणि यातून प्रपंच कसा चालवायचा, विचारचक्रात व्यापारी गुरफटले आहेत. व्यवसायाची चाके मंदावल्यामुळे अगोदरच व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यात केंद्र सरकारने जीएसटीचे धोरण व्यापाऱ्यांना आणखी मंदीच्या गर्तेत ओढले आहे, असेही काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अजूनही मंदीचे सावट सरले नाही तर जे काही व्यापारी थोडाफार व्यवसाय करीत आहेत. तेही व्यापारी यातून सुटणार नाहीत. अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक बोजा कसा कमी करायचा, हाच विचार व्यापारी करीत आहेत. सध्या व्यवसायाला चांगले दिवस येतील. यातून नक्कीच चांगला मार्ग निघेल, याच आशेच्या हिंदोळ्यावर छोटे-मोठे व्यावसायिक जगत आहेत. सध्या व्यापारी, विक्रेते मंदीच्या संक्रमणवस्थेतून जात आहेत.
आर्थिक मंदी कधी हटणार?
जागा खरेदी, फ्लॅटधारक, मोठे व्यावसायिकांचीही आर्थिक मंदीमुळे गळचेपी झाली आहे. त्यांच्यासमोर कामगारांचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात बॅंकांकडून कर्ज उपलब्ध करून हे मोठमोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत. सर्वच व्यवसायात आर्थिक मंदी निर्माण झाल्याने हेही मोठे व्यापारी आर्थिक मंदीच्या सावटाखाली सापडले आहेत. मंदीला कसे सामोरे जावे, ही आर्थिक मंदी कधी हटणार, याच विचारात सर्व व्यापारी चिंताग्रस्त झाला आहे.