नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी निर्णय दिल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडपीठातील इतर न्यायाधीशांना डिनरला घेवून गेले होते. पाच न्यायाधीशांच्या पीठात सरन्यायाधीश गोगोई यांच्यासह न्या. अशोक भूषण, न्या. एस ए नझीर, न्या. एस ए बोबडे आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांचा समावेश होता.
अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी शनिवारी सकाळी निर्णय दिल्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी सर्व न्यायाधीशांना रात्र भोजनाची घोषणा केली आणि त्यांनी स्वतः त्यांना मानसिंह हॉटेलमध्ये नेले. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय देत अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त केला आणि त्याचबरोबर मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, वादग्रस्त 2.77 एकर जमीन आता केंद्र सरकारच्या रिसिव्हरकडे असेल. एक विश्वस्त समिती बनल्यानंतर त्यांच्याकडे ती जागा सोपवली जाईल. येत्या तीन महिन्यात मंदिर निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक विश्वस्त मंडळ स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित जागेवरच भगवान राम यांचा जन्म झाला होता. तेच या जमिनीचे प्रतिकात्मकरित्या मालक आहेत, असा हिंदूंना विश्वास असल्याचे सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या संविधान पीठाने एकमताने निर्णय देताना म्हटले.