मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला असताना संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या वाझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून, अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 14, 2021
काय म्हणाले संजय राऊत
”लोक तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत बोलून डाग लावू शकतात. ते तुमच्या प्रतिमेला उद्ध्वस्त करू शकतात. मात्र ते तुमच्या चांगल्या कामाला हिसकून घेऊ शकत नाही. तुमच्या कामाबाबत ते काहीही बोलले तरी तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील.”
‘हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणीत सुरुवातीपासूनच सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेलं दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी ट्विट करत केली आहे.