मुंबई : राज्यातील सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ बडोद्यात होणार असून २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आणखी एक राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचा आदित्य ठाकरे दौरा करत आहेत. त्यावेळी टाटाचा सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल आदित्य ठाकरेंना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारले. त्यावर बोलताना “खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
“‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण, पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.