मुंबई -कोविडमधून बरे झाल्यानंतरसुद्धा काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपर्यंत लक्षणे आढळतात, तर काही जणांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ लक्षणे दिसून येतात.
कोविडमधून बरे झाल्यानंतर थकवा, अपचन, दीर्घकाळ अंगदुखी, स्नायूदुखी, छातीत धडधड होणे, अतिघाम येणे, दोन महिन्यानंतरही तोंडाला चव न येणे, नैराश्य ही लक्षणे दिसून येतात.
योग्य आहार आणि नियमित व्यायाम, योग या माध्यमातून पूर्णपणे बरे होता येते. कोविडमधून बरे झाल्यानंतर पोषण या वेबिनारमध्ये डॉ.निखिल बांते आणि पोषण आणि आहारतज्ज्ञ इशी खोसला यांनी मार्गदर्शन केले, त्यात ही माहिती दिली.
विषाणूमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रीय होते, ज्यामुळे अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा त्रास जास्त कालावधीसाठी राहतो, असे डॉ बांते म्हणाले.
रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन रक्ताच्या गाठी निर्माण होतात. रक्तात गाठी निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराची शक्यता असते. मात्र हे प्रमाण कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांपैकी 5 टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांमध्ये आढळते, असे ते म्हणाले.
कोविडमधून बरे झाल्यानंतर 10 टक्के रुग्णांना दीर्घकाळासाठी पूरक ऑक्सिजनची आवश्यकता असते. बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना छातीचा त्रास जाणवतो.
कोविड उपचारादरम्यान रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे जिवाणू संक्रमण आणि बुरशीजन्य संक्रमण आढळते. बुरशीजन्य संक्रमण केवळ तीव्र मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेले आणि कॅन्सर रुग्णांमध्ये आढळते, असे डॉ निखिल बांते यांनी सांगितले.
कोविडदरम्यान उपचारात शरीराचा ऱ्हास होतो. त्यामुळे बरे झाल्यानंतर समतोल आणि पोषक आहाराची आवश्यकता आहे, अशी माहिती आहार आणि पोषणतज्ज्ञ इशी खोसला यांनी दिली.
आहारात कार्बोहायड्रेटस, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भाज्यांमुळे फायबर मिळते. ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे, त्यांनी एकच वेळ आहार घ्यावा.
आहारात प्रथिनांएवढेच स्निग्ध पदार्थांचे महत्त्व आहे. स्निग्ध पदार्थांमध्ये कच्चे नारळाचे तेल, तूप, ओमेगा-3 यास प्राधान्य द्यावे, असे श्रीमती खोसला यांनी सांगितले.
शक्यतो एकवेळच्या जेवणात सलाड आणि कच्च्या भाज्या मोठ्या प्रमाणावर असाव्या. कारण, कोविड उपचारादरम्यान असे दिसून आले आहे की, ज्या रुग्णांमध्ये “ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 20 पेक्षा कमी आहे, त्यांना त्रास जाणवला.
ज्या रुग्णांमध्ये “ड’ जीवनसत्वाचे प्रमाण 30 पेक्षा अधिक आहे, त्यांना कसलाही त्रास जाणवला नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी “सी’, “डी’, जीवनसत्व असलेली फळे, झिंक, बी-कॉम्प्लेकस, मॅग्नेशिअम यांचा वापर असावा.
पपई, सुके जर्दाळू, मशरुम यांचा प्रमाणात वापर करावा. तसेच सहज उपलब्ध असलेल्या तुळशी, गुळवेल, आद्रक, लसूण, कडूनिंबाची पाने, आवळ्याचा रस, मध, हळद, अश्वगंधा, काळी मिरी याचा काढा करून प्यावा, असा सल्ला इशी खोसला यांनी दिला.