मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली टळल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बदली न करण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्र्यांना न विचारताच मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांना अंधारात ठेवून वाहनांसाठी 2 किमी लक्ष्मणरेषेचा आदेश दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना माहिती न देताच परस्परच करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शहिदांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला होता.
मुंबई पोलीस आयुक्तांनी तीन महत्त्वाचे निर्णय न विचारता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे त्यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने परमवीर सिंग यांची बदली टळली.
दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या बदल्यांवर राष्ट्रवादी पक्ष नाराज होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला न विचारताच बदल्यांचा निर्णय घेतला होता.