मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मराठवाड्यात कोरोनाने कहर केला आहे. नांदेड मध्ये तर मागच्या १५ दिवसात ९ हजार कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे अशा वारंवार सूचना देवूनही ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यत लॉककडाऊन जाहीर करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये या अगोदर सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला होता. 13 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता.बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील स्थिती सर्वात बिकट आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड परिचित आहे. अशात लॉकडाऊन पडले तर रोजगार कसा उपलब्ध करायचा असा सवाल मजूर आणि व्यावसायिकांना पडला आहे.