पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांसाठी स्थगित केलेल्या लोकल, डेमू सेवा अद्यापही खुल्या झाल्या नाहीत. मुंबईमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, पुण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे पुण्यातील लोकल, डेमू, पॅसेंजर सेवा नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी आता प्रवाशांकडून होत असून, पुण्याबाबत दुजाभाव का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्चपासून नियमित रेल्वेसेवा स्थगित करून, विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. यामध्ये केवळ “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश आहे. याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवादेखील बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मात्र, दुसरीकडे मुंबईमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवहार खुले झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मात्र, रेल्वेकडून अद्यापही सर्वसामान्यांना उपनगरीय सेवांमध्ये प्रवेश देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, पुणे-बारामती आदी मार्गांवरील प्रवासास मुभा देण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
मागील दीड वर्षांपासून लोकल, डेमू, पॅसेंजर, एक्स्प्रेस आदी सेवा बंद आहेत. पुण्यातील नागरिकांनीदेखील लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातून जोडणाऱ्या उपनगरीय सेवा सुरू कराव्यात. रेल्वे बोर्डाने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्यूआर कोडऐवजी रेल्वेने प्रवाशांना पास द्यावेत.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
पुण्यातील लोकल, डेमूमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा आहे. शासनाकडून निर्णय घेण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासन त्यानुसार सेवा सुरू करेल. – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग