नवी दिल्ली – मागील आठ दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अंत लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार की नाही? आणि झाले तर ते कशाप्रकारे होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीची मागणी करणारं पत्र राज्यपालांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये राज्यातील राजकारणाच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेचे ३९ आमदार महाराष्ट्राबाहेर आहे. हे सर्व आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये राहू इच्छित नाही. सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे सरकारला बहुमत चाचणीचे आदेश द्यावे अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं फडणवीस म्हणाले.
तिकडे, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील सर्व आमदारांसह मुंबईत येणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच गुजरातच्या वडोदामध्ये फडणवीस आणि शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. यानंतर फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती. शिंदे यांनी अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थन परत घेत असल्याचे म्हटले होते.