नवी दिल्ली – आपल्या देशातील जनतेच्या मनात काय चालले आहे हे महात्मा गांधी यांना कळत होते. त्यानंतर आता पतंप्रधान नरेंद्र्र मोदी हेच एकमात्र असे नेते आहेत की त्यांना जनमानसाच्या मनात काय चालले आहे ते समजते असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केला आहे. जे लोक मोदींवर विश्वास ठेवतात त्यांच्याशी ते थेटपणे जोडले जातात, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार अजय सिंह यांनी लिहिलेल्या आर्किटेक्ट आफ न्यू बीजेनी: हाउ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म द पार्टी या पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, मोदी यांनी विचारधारेशी तडजोड न करता आपल्या नवसंकल्पनांद्वारे भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकणारी मशिन बनवले. संघटनात्मक क्षमता, लोकांशी संपर्क आणि खालच्या स्तरावर असलेल्या अडचणींची समज यामुळे आज मोदी जगातले सगळ्यांत लोकप्रीय नेते ठरले आहेत.
मोदींना पर्याय शोधण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत मात्र त्यांना त्यात अद्याप यश आलेले नाही. लोकांशी जोडलेले राहा, तुम्हाला यश आपोआप गवसेल हाच मोदी यांचा मंत्र आहे. मोदींकडे ज्या क्षमता आहेत त्या कोणती दैवी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही. समस्यांची जाण आणि जनमानसाची नाडी ओळखण्याची अदभूत क्षमता यामुळे त्यांनी जगातल्या अनेक लोकांना खूप मागे टाकले आहे.
अमेरिकेच्या द मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत राजनाथ म्हणाले की, मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यासह 12 राष्ट्रांच्या प्रमुखांना लोकप्रीयतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. (After Mahatma Gandhi, PM Modi knows what is going on in people’s minds – Rajnath Singh)