मुंबई – 2019 साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांच सरकार स्थापन केले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला होता. ‘शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाले होते’, असे विधान त्यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला होता.
दरम्यान, फडणवीस यांच्या या विधानानंतर आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील पहाटेच्या शपथविधी बद्दल एक मोठं व्यक्तव केलं असून, पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत.
सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचं सत्य सांगितलं आहे.” असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना कोश्यारींनी सांगितलं की, “दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचं पत्र दाखवलं. नेते विश्वसनीय आहेत. अजित पवार छोटे नेते नाहीत. ते मला येऊन भेटले. मी म्हणालो ठिक आहे. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली.
पुढे कोर्टात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचं सत्य सांगितलं आहे.” असं ते यावेळी म्हणाले.