मुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया नोव्हेंबरमध्ये होणार
शिक्षण विभागाकडून अखेर शिक्कामोर्तब
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुलाखतीशिवायची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खासगी शाळांमधील शिक्षक भरती विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्येच होणार आहे. यावर शिक्षण विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
पवित्र पोर्टलमार्फत 12 हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केलेला आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणीही केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांची नियुुक्ती पत्रे देण्यात आलेली आहेत.
सुमारे 7 हजार उमेदवारांनी निवड यादीत संधी न मिळाल्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. याची तपासणी सुरू असून यातील नियमांत बसणाऱ्या अर्जांचा गांभीर्याने विचार करुन त्या उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
उर्दू माध्यमातील आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने त्या जागा “कन्व्हर्ट’ करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. माजी सैनिकांच्या उमेदवारांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. समांतर आरक्षणात पात्र असलेल्या उमेदवारांचीही तपासणी सुरु आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रत असणाऱ्या उमेदवारांनाही न्याय मिळणार आहे.
पोर्टलवरील भरतीच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन त्यात आवश्यक ते बदलही करण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रियेचे सर्व कामकाज झाल्यानंतरच खासगी शाळांमधील शिक्षक भरती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत पोर्टलवर सूचनाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.
– उमेदवारांच्या तक्रार अर्जांची दखल घेणार
– उर्दू माध्यमाच्या जागा होणार “कन्व्हर्ट’
– समांतर आरक्षणातील उमेदवारांना न्याय मिळणार
– निवड यादीतील 400 जागा रिक्त राहण्याची शक्यता
– शिक्षणाधिकाऱ्यांकडून अंतिम अहवाल सादर होईना