मुंबई – करोनाच्या साथीचा नागरिकांच्या जीवनमानावर अनेक तऱ्हांनी परिणाम झाला आहे. भारतातील नागरिकांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले आहे, असे एका अभ्यासाद्वारे निदर्शनास आले आहे. मुंबईतील “इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज’ने याबाबतचा अभ्यास अलीकडेच प्रसिद्ध केला आहे.
करोना साथीमुळे जन्माच्यावेळी पुरुष आणि स्त्रियांमधील आयुर्मानात ही घट झाल्याचे या विश्लेषणात्मक अहवालातून निदर्शनास येते आहे. “बीएमसी पब्लिक हेल्थ’ या आरोग्यविषयक नियतकालिकामध्ये अलीकडेच हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेचे प्राध्यापक सूर्यकांत यादव यांनी हा अभ्यास निबंध लिहिला आहे.
2019 मध्ये पुरुषांचा आयुर्मान 69.5 टक्के होते. तर महिलांचे आयुर्मान 72 टक्के होते. हे आयुर्मान 2020 मध्ये पुरुषांसाठी 67.5 टक्के आणि महिलांसाठी 69.8 टक्के इतके घटले आहे. प्राध्यापक यादव यांच्या या अभ्यासामध्ये “आयुष्यातील अशाश्वती’ अशा घटकाचीही चर्चा करण्यात आली आहे.
करोनाच्या साथीमध्ये मरण पावलेल्या पुरुषांचे आयुर्मान 39-69 वर्षांदरम्यानचे होते, असा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. 2020 मध्ये 35 ते 79 या वयोगटातील अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. यामुळेच आयुर्मान लक्षणीयरित्या घटले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.