नागपूर – मित्रांना कॉन्फरन्स कॉल करून १९ वर्षीय तरुणाने आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अथर्व राजू आनंदेवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अथर्वने मित्रांशी बोलताना मी आत्महत्या करतोय माझ्या आईकडे लक्ष द्या असे म्हणत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
अर्थव पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळपासूनच अथर्व काहीसा तणावात होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्याने आपल्या तीन मित्रांना कॉन्फरन्स कॉल लावला आणि आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. यावेळी अथर्वने मित्रांशी बोलताना सांगितले की, ‘मी आत्महत्या करतोय माझ्या आईकडं लक्ष द्या’. असे बोलल्यानंतर मित्रांनाही धक्का बसला. मित्रांना त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचही न ऐकता आपल्या दुचाकीसह तलावात उडी मारली.
पोलिसांनी अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.