मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. दरम्यान भाजपाकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.