मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पारनेरच्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी खळबळ उडवली होती. या पाच नागरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती.
या पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मोलाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी पहिल्यांदा या प्रकणावर भाष्य केले आहे. आज सारथी संदर्भात महत्वाची बैठकी झाली यामध्ये अजित पवारांना पारनेर प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार म्हणाले, त्या दिवशी बारामतीत होतो. तिथे आमदार निलेश लंके आले. ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले. कार्यक्रम झाला आणि मग मला कळलं की, ते शिवसेनेचे होते.
नंतर याबाबत निलेश लंकेंना विचारल, लंके म्हणाले, दादा ते भाजपात जाणार होते. राष्ट्रवादीने घेतलं नाही, तर आम्ही भाजपात जाऊ अस त्या नागरसेवकांचं म्हणणं होत. आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंके यांना बोलावून सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.