नगर – नगर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उभारण्यात येत असलेल्या फेज 2 व अमृत पाणी योजनेचे काम अखेर तब्बल 13 वर्षांनी पूर्ण झाले. बुधवारी महापालिकेने मुळा धरणातून वसंत टेकडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी आणण्यासाठी केलेली चाचणी यशस्वी झाल्याने आता नगरकरांना नव्याने पाणीयोजनेतून पाणीपुरवठा होण्याची प्रतीक्षा संपली आहे. ही योजना लवकरच कार्यन्वित होणार असून संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल.
बहुप्रतिक्षित अमृत पाणी योजनेचे काम पूर्णत्वास गेले असून मुळा धरण ते नगर शहरातील वसंत टेकडी असे 34 किलोमीटरपर्यंत 1 हजार 100 मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरू असताना अनेक अडथळे आले होते. ते मार्गी लावत. अखेर ही योजना पूर्ण झाली. पुढील 40 वर्षाचा विचार करून ही योजना पूर्ण झाली आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे 45 दशलक्ष लीटरचे नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
याच ठिकाणी पंप हाऊस, विद्युत सबस्टेशन उभारण्यात आले आहे. याचबरोबर 600 अश्वशक्तीचे तीन पंप बसवण्यात आले आहे. दोन पंप चालू ठेवण्यात येणार असून एक पंप स्टॅन्डबाय राहणार आहे. मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी यशस्वी होऊन टाकीत पाणी पडले. याची पाहणी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक श्यामआप्पा नळकांडे, जलअभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. जावळे म्हणाले की, अमृत जलवाहिनीच्या चाचणीचे काम अंतिम टप्प्यात असून वसंत टेकडी येथील टाकीत योजनेचे पाणी आले आहे. उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात ही योजना कार्यान्वित होऊन नगरकरांना या योजनेचे पाणी मिळेल. योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील सर्व भागात वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे असे ते म्हणाले.
जलअभियंता परिमल निकम म्हणाले की, अमृतपाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणी दरम्यान आलेले अडथळे दूर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे आठ ते दहा दिवसात नागरिकांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. शहरातील आधीच्या जलवाहिन्यांमधून अमृतचे पाण्याचे वितरण केले जाणार आहे असे ते म्हणाले.