काबूल – अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आलेल्या तालिबानी सरकारमधील घटक असलेल्या हक्कानी नेटवर्कने भारताविरोधात विषारी फुत्कार सोडले आहेत. भारत हा अफगाणिस्तानचा खरा मित्र नाही, असे हक्कानी कुटुंबाचा वंशज अनास हक्कानी यांने म्हटले आहे. भारत सरकार, भारतीय प्रसिद्धी माध्यमे आणि अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावरही अनास हक्कानीने जोरदार टीका केली आहे.
हक्कानी नेटवर्कचा तालिबानी नेत्यांबरोबर कोणतेही मतभेद नाहीत. अशा आशयाच्या बातम्या पूर्वीच्या अशर्रफ घनी यांच्या सरकारशी संबंधित लोकांकडून मुद्दाम पसरवल्या जात आहेत, असेही अनास हक्कानी एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.
अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारला मान्यता लवकरात लवकर दिली जायला हवी. यासंदर्भात जर्मनीकडून सर्वात प्रथम अफगाणिस्तानमध्ये आपला दूतावास सुरू केला जाऊ शकतो, अशी शक्यताही त्याने वर्तवली.
अमेरिकेबरोबर कोणतीही छुपी आघाडी केली गेलेली नाही. अमेरिकेकडून ड्रोनचा वापर केला जात आहे. मात्र यात अफगाणिस्तानमधील निरपराध लोक मारले जात आहेत, असा दावाही अनास हक्कानीने केला.
तालिबानमध्ये आता खूप बदल झाला आहे. केवळ एका व्यक्तीपुरती तालिबानची ओळख राहू दिली जाऊ नये, असेही तो म्हणाला.