सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती. आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते.
हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने रोग्याची काळजी घेणे, पर्यायाने रोगाचे निर्मूलन करणे शक्य होते. पृथ्वीवर होणारे बदल लक्षात घेऊन आयुर्वेदाने वसंत, हेमंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर हे सहा ऋतू मानले आहेत. मात्र, हे सर्व ऋतू प्रत्येक देशांमध्ये जाणवतातच असे नाही. हेमंत, ग्रीष्म हे उत्तर ध्रुवावर तर वर्षा, शिशिर, शरद हे ऋतू दक्षिण ध्रुवावर आढळतात.
शारीरिक आरोग्याची आयुर्वेदिक संकल्पना तीन ऊर्जा संकल्पनांभोवती रचण्यात आली आहे. हे शरीरातील मानसिक किंवा रासायनिक स्त्रोत आहेत. या ऊर्जा घटकांवर संपूर्ण शरीराची क्षमता अवलंबून असते. वात, पित्त आणि कफ हे तीन रस जीवनाकरता आवश्यक असून, यांच्या परस्पर कार्यातूनच निरोगी जीवन साकारते. या तीन घटकांमध्ये परस्परांत असंतुलन निर्माण झाल्यास त्याची परिणती विविध प्रकारच्या आजारांची निर्मिती होण्यात होते.
दोषाचे असंतुलन त्वचा आणि केस यामध्येही दिसून येते. त्यामुळेच त्वचाविषयक उपचारपद्धतींचे संतुलन करण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासत असून, ऋतूनुसार दोषाचे प्रकार बदलतात. वर्षा ऋतूतील मुख्य भाग म्हणजे थंड, दमट हवा असून, यामुळे असंतुलन निर्माण होते आणि वात तसेच पित्ताला चालना मिळते. दमट त्वचा आणि केसांना हानी पोहोचवते, सूज येणे, त्वचा निस्तेज होणे आदी आजार डोके वर काढतात.
वात विकाराने दूषित त्वचा व केस
वातामुळे त्वचा तसेच केस आपले पोषकत्व टिकवून ठेवू शकत नाहीत. त्याकरता पोषकत्व वाढवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हज वापरलेली स्कीन केअर उत्पादने टाळावीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते आणि ती कोरडी पडते. तुमच्या त्वचेला तसेच केसांना पुरेसे पोषण मिळावे, यासाठी गरम, पोषक अन्न घ्यावं. कोरडे अन्न टाळा. रात्री लवकर झोपा आणि दररोज तेलाने मालिश करा.
गरम तसेच स्निग्ध पदार्थांचे सेवन करा (तूप व ऑलिव्ह ऑईल सर्वात चांगले)
संपूर्ण दिवसभर कोमट पाणी प्या आणि भरपूर प्रमाणात गोड, रसपूर्ण फळे खा. साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं.
अल्कोहोलवर आधारित स्कीन क्लेनसर्स वापरू नका
साबणाऐवजी चणाडाळीची पावडर वापरा
दाणे, बदाम, अक्रोड आणि त्याचे तेल, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि त्याचे तेल, द्राक्षबियांचे तेल, प्रिमरोज ऑईल, सोयाबीन ऑईल, सर्व प्रकारची धान्ये यांचे सेवन करावं.
कॅफीन, शीतपेय, साखर, चॉकलेट, पोटॅटो चीप्स आणि जंक फूड टाळावं.
पिंडाथायलम किंवा धनवंतरम कुझम्फू किंवा बालअश्वगंधी कुझम्फू यासारखे आयुर्वेदिक तेल दररोज आंघोळीपूर्वी 15 मिनिटे लावावं
लवकर आणि नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करावी.
पित्तामुळे होणाऱ्या त्वचा/ केस विकार
पित्ताने बाधित असलेल्या संवेदनशील त्वचेला शांत करण्यावर भर देणारी उपचारपद्धती उपयोगात आणावी. टॅनिंग सलून्स, स्टीम फेशिअल आणि उन्हात बराच काळ जाणे यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. पित्ताचा त्रास असलेल्यांच्या त्वचेत तेलाचे प्रमाण अधिक असते. आंघोळीकरता थंड पाणी वापरावे. पण बर्फासारखे थंड पाणी वापरू नयेत. जळजळीत, उष्ण अन्नपदार्थ टाळावेत, उन्हात व्यायाम करू नये. सिंथेटिक रसायने, प्रिझर्वहेटिव्ह आणि अन्य परिणाम करणारे घटक टाळावेत.
दिवसातून 2-3 वेळा हिरव्या चण्याची पावडर आणि बेसन (समप्रमाणात) पाण्यात मिसळून चेहरा धुवावा. आंघोळीपूर्वी अर्धा तास चेहऱ्यावर अर्धा चमचा लिंबू आणि काकडीचा रस यांचे मिश्रण लावावे.
शक्य असेल तेव्हा मेकअप टाळावा. चेहऱ्यावरील छिद्रे न बुजवणारा पाण्यावर आधारित मेकअप करावा.
पपया, मध, दूध, दुधाची पावडर यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट (25) करा आणि मधात (2 चमचे) मिसळून फेस पॅक म्हणून लावावा. सुकण्यापूर्वी पॅक काढून टाकावा.
आंघोळीपूर्वी मध आणि दह्याचे मिश्रण करून बॉडी मसाज करावा.
सहजगतीने पचण्याजोगे अन्न वापरावे. यात जुने धान्य, तूप घातलेली सुप्स, सुके मांस, डाळी, मध, खडे मीठ, पिपली, गोड, आंबट आणि खारट, भाज्या/ डाळी यांचे कमी तिखट सूप याचे सेवन करावे.
काय टाळाल?
दिवसाची झोप
अतिश्रम
अतिरिक्त आर्द्रता टाळा आणि स्वत:ला उबदार वातावरणात ठेवा.
थंडीत काय कराल?
थंडीत आपल्या हातापायाची त्वचा सुरक्षित ठेवण्याकरता आज सौंदर्यक्षेत्रात मेनिक्युअर, पेडिक्युअर या ट्रिटमेंटच्या पलीकडे जाऊनही काही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नावीन्यपूर्ण ट्रिटमेंट केल्या जात आहेत. फिश पेडिक्युअर, ऑईल मेनिक्युअर तसंच अनेक प्रकारच्या स्पा थेरपीज अशा वैविध्यपूर्ण ट्रिटमेंट प्रत्येक सलोनमध्ये आपल्याला सहज दिसून येतात. पण वेळेअभावी तासनतास सलोनमध्ये बसून या थेरपीजचा आनंद आपल्याला घेता येत नाही.
आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण अशा वेळी करू शकतो. पण या गोष्टींचा आपल्याला साफ विसर पडतो. या वस्तूंपासूनच आपण असे काही स्क्रबर्स, पॅक्स आणि लोशन बनवू शकतो ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या हातापायांच्या त्वचेची काळजी घरच्या घरी घेणं सोपं आहे. एका प्लॅस्टिकच्या भांड्यात दोन कप थोडं कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा मीठ घालावं आणि हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे हातापायांना लावल्यास त्वचेवरील मृतपेशी(डेड सेल) निघण्यास मदत होते. त्यानंतर मॉश्चराइजर नक्की लावावं.
2/3 कप गुलाब पाणी, 1/3 कप ग्लिसरीन, एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून हे मिश्रण एका बाटलीत भरून कोरड्या आणि स्वच्छ जागेत ठेवावे आणि आठवड्यातून एकदा हातापायांना लावावं. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि कोरडेपणादेखील कमी होतो.
अर्धा कप संत्र्याचा रस, एक चमचा मध, हे मिश्रण 10 मिनिटे हातापायांना लावून ठेवावं. नखांवर हे मिश्रण योग्य पद्धतीने आणि अधिक प्रमाणात जरी लावलं तरी नखं चमकदार दिसतात.
एक केळं, एक चमचा मध आणि लिंबाच्या रसाचे थेंब हे मिश्रण क्रीमसारखं दिसेल अशाप्रकारे एकजीव करून घ्यावं. या क्रीमने मसाज करावा. शक्य झाल्यास दोन तास तसंच हातापायांवर ठेवावं. अन्यथा 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने
धुवून टाकावं. त्वचेच्या कोरडेपणावर ही क्रीम खूप फायदेशीर ठरते.
मिनरल ऑईल किंवा कॅस्ट्रोल ऑईल (एरंडेल तेल), ग्लिसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन/मॉश्चरायझर इत्यादींचे समप्रमाणातील मिश्रण एकत्र करून ते एका बाटलीत भरून ठेवायचे. आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावावे, लावताना ते त्वचेत चांगले जिरले पाहिजे. (मिनरल ऑईल कुठल्याही सुपरमार्केटमध्ये लॅक्सेटिव्ह सेक्शनमध्ये मिळते.)
अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे फ्रेश क्रीम एकत्र करून हे मिश्रण 15 मिनिटे लावून ठेवावं आणि नंतर कोमट पाण्याने धुवावं, हे मिश्रण लावल्यामुळे तुमची त्वचा खूप मऊ-मुलायम होते. एक अंडे, एक चमचा बदाम तेल आणि थोडंसं गुलाब पाणी एकत्र करून हे मिश्रण 10-15 मिनिटे लावल्यास त्वचेला टायटनिंग आणि पोषण मिळतं. एक चमचा बदाम तेलात तीन चमचा साखर घालावी. गरज वाटल्यास तेलाचं प्रमाण वाढवू शकता. हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे लावून ठेवावं.
नंतर बॉडी लोशन नक्की वापरा. एक चमचा (बेबी, ऑलिव, बदाम, तिळाचं) यांपैकी कोणतंही तेल, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध. हे मिश्रण पायाच्या भेगांवर लावल्यावर आराम मिळतो. कोमट पाण्यात जाड मीठ किंवा एक लिंबू पिळून त्यात 10 मिनिटे पाय ठेवल्यास देखील खूप फायदा होतो. लिंबाचा रस आणि पपईचा गर एकत्र करून 10 मिनिटे लावल्यास पायाच्या भेगा कमी होण्यास मदत
झोपेची समस्या सोडवा…
झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून सिद्ध झाले आहे. अपुऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेचे कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून आले आहे. पुरेशी झोप मिळत नसेल, तर मेंदूचे व शरीराचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही आणि त्यामुळे जीवनमानाचा दर्जा लक्षणीयरीत्या खालावतो. म्हणूनच निरोगी मेंदू आणि शरीरासाठी झोपेचे वेळापत्रक नीट सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्याने सौंदर्यही बिघडते
निसर्गाची लय आणि आपल्या शरीराचे घड्याळ यांच्यातील संबंध ओळखा :
तुम्हाला ही गोष्ट कदाचित नवलाची वाटेल, पण आपले शरीराचे घड्याळ दिवस आणि रात्रीच्या चक्राशी नैसर्गिकरीत्या जोडलेले असते. आपले शरीर सिर्काडियन ऱ्हीदमच्या आधारे आपल्या झोपेच्या वेळा ठरवते व ही लय उजेडाचे अस्तित्व आणि अभाव यांच्याशी जोडलेली असते. आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या शरीरावर ऊन पडते आणि शरीराकडून संपूर्ण शरीराकडे एक संदेश पाठविला जातो, ज्याद्वारे चयापचय यंत्रणा सक्रिय होते. त्याचप्रमाणे सूर्यास्त होताना आपल्या शरीरातील मेलॅटॉनिनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीर झोपेला येते व आपल्याला अधिक चांगली झोप लागण्यास सहाय्य होते.
झोपण्याची आदर्श वेळ :
सिर्काडियन लयीनुसार रात्र ही झोपण्यासाठीची आदर्श वेळ आहे, तर सकाळ ही उठण्यासाठीची आदर्श वेळ आहे. या वेळा साधारणपणे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांशी मेळ खाणाऱ्या आहेत. रात्री 12 ते 4 या वेळेत आपल्याला सर्वात गाढ अशी झोप लागते, त्यामुळे आपण ठरल्या वेळी नीट झोपी जाणे आवश्यक आहे. पण, वेळेवर झोपला नाहीत, तर रात्री 3 ते 6 च्या दरम्यान तुम्हाला झोपावेसे वाटेल व त्याचा परिणाम दिवसातील कामावर होईल.
अपुऱ्या झोपेचे शरीरावरील परिणाम
स्मरणशक्ती :
ज्या व्यक्ती एखादे काम शिकल्यानंतर/अभ्यास पाठ केल्यानंतर झोपतात, त्या परीक्षेत चांगली कामगिरी करतात. झोपेमुळे मेंदू मेमरी कन्सॉलिडेशन किंवा माहिती पक्की करण्याच्या आपल्या गुणधर्माद्वारे नवी माहिती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो.
वजन वाढणे :
खूप काळ झोपेपासून वंचित राहिल्यास किंवा उशिरा झोपण्याची सवय लागल्यास वजन वाढू शकते, कारण अशा झोपेमुळे चयापचय यंत्रणा तसेच शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होतो व त्याचा परिणाम भुकेवर होतो.
– डॉ. शितल जोशी